नागपूर: जलसंपदा विभागातील प्रलंबित कामे आणि प्रशासकीय संथपणा दूर करण्यासाठी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. समाजसेवक विवेक पारकर यांनी राज्य शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली असून, विभागात सक्षम आणि कडक प्रशासकीय नेतृत्वाची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे.
विभागातील कामकाजावर नाराजी
विवेक पारकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, "जलसंपदा विभागाचे कामकाज गेल्या काही काळापासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. महत्त्वाच्या विकासकामांच्या फाईल्स अनेक महिने प्रलंबित राहत असल्याने निर्णयप्रक्रियेत अडथळे येत आहेत. यामुळे प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून त्यांची कार्यक्षमता कमी होत आहे."
मुंढे यांच्या शिस्तीची गरज
या संदर्भात बोलताना पारकर म्हणाले की, तुकाराम मुंढे यांच्यासारख्या प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि गतिमान निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्याची जलसंपदा विभागाला नितांत गरज आहे. मुंढे यांनी आपल्या कारकिर्दीत पारदर्शकता आणि प्रशासकीय शिस्तीचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे विभागातील ठप्प पडलेली कामे पुन्हा मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अप्पर मुख्य सचिवांवर गंभीर आरोप
सध्याचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांच्या कार्यपद्धतीवरही पारकर यांनी तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. "कपूर यांच्या कामकाजामुळे विभागाची प्रतिमा मलिन होत असून करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यांच्या विरोधात तक्रारी असूनही शासन दखल का घेत नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विदर्भातील निवडणुकांदरम्यान अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मतदानाच्या हक्काबाबत झालेल्या तक्रारींवरही कारवाई न झाल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
निवृत्तीनंतर नवीन संधी
दीपक कपूर हे येत्या ३० तारखेला निवृत्त होत आहेत. हीच संधी साधून शासनाने जलसंपदा विभागाला नवीन आणि कार्यक्षम नेतृत्व द्यावे, अशी ठाम मागणी विवेक पारकर यांनी केली आहे.
राज्याच्या सिंचन आणि पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या विभागात आता शासन काय निर्णय घेते आणि तुकाराम मुंढे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

